आमच्या विषयी

नासिक शहर हे आपल्या देशातील एक सगळ्यात वेगाने वाढ होणारे शहर आहे ह्‍यामुळे शहरातील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेवर नेहमीच ताण रहातो ही व्यवस्था सुरळीत चालण्यास नागरीकांनीही हातभार लावणे गरजेचे आहे. तरच ही अपेक्षेप्रमाणे काम करेल हीच स्थिती थोड्या फार फरकाने इतर ठिकाणी ही आहे. ह्‍याचा विचार करता नाशिक येथे राहणाऱ्या काही समविचारी नागरिकांनी कै. श्री भीष्मराज बाम यांच्या प्रेरणेने सुजाण नागरिक मंचची स्थापना केली

ह्‍या संस्थेचे उद्देश पुढील प्रमाणे.

  • एक स्वच्छ अरोग्याला पोषक निटनेटक्या व राहण्यायोग्य वातावरण निर्मितीस हातभार लावणे.
  • रस्त्यावर, घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्व साधारण नागरीकांच्या सुरक्षितेत सुधारणा होईल असा प्रयत्‍न करणे.
  • एक चांगली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निर्माण करणे व टिकवुन ठेवण्यास मदत करणे.
  • सर्व साधारण जनतेला व विशेषत: कार्यकर्त्याना आपल्या स्वच्छता व सुरक्षेच्या उद्दिष्‍टांना कसे मिळवायचे त्या बद्दलची माहिती व प्रशिक्षण देणे.
  • आपत्‍ती व्यवस्थापन करता ह्‍या कार्यातील तज्ञ सरकारी अधिकारी नागरी यंत्रणा व उत्स्फुर्स सेवा देणाऱ्या कार्यकर्ता वर्गाचा समन्वय साधणे.
  • संस्थेची कार्यकारी समीती आपल्या अखत्यारीत कुठल्याही प्रकारचा समाज सेवेशी निगडीत कार्यक्रम तत्कालीन गरजेप्रमाणे हाती घेते.
  • ही संस्था सामाजिक कार्याला वाहुन घेतलेली संस्था असुन तिचा कुठल्याही राजकिय पक्षाशी किंवा धार्मिक संस्थाशी कुठलाही संबंध नाही.

"कचऱ्यातुन सुशोभिकरण"

मंचच्या पुढाकाराने पानगळीचा कचरा घंटागाडीत न देता स्थानिक स्तरावर खत करण्याच्या उपक्रमाला हाती घेण्यात आले.ह्या करता श्री रंजनभाऊ ठाकरे ह्यांच्या सहकार्याने महात्मानगर बस स्टॉप जवळ फुलांचे ताटवे करण्यात आले आहेत.खताचा वापर करुन फुल झाडे लावून सुशोभिकरण करता येईल ह्या सर्वांमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पानांचा कचरा न जाळता स्थानिक स्तरावर स्वच्छता करता येईल व महानगरपालिकेला तो कचरा पाथर्डीपर्यंत घेऊन जाण्याची गरज राहणार नाही.मंदिरातल्या निर्माल्याचे खत करण्याकरता मंदिरातच गांडुळखत(Vermi Composting) करण्याची व्यवस्था केली आहे.अशीच व्यवस्था वैशंपायन शाळेमध्येपण करण्यात आली आहे.जेणे करुन शाळेतील मुलांना ह्याची माहीती आपोआप होईल.हे सर्व प्रकल्प नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ प्रविण गेडाम साहेबांना दखवण्यात आले तेव्हा त्यांनी ह्या प्रकल्पांची तोंड भरुन स्तुती केली.

ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन घरच्या घरीच :

या संस्थेतर्फे ९ ऑगस्ट रोजी महात्मानगर मंदीर परिसरात ’स्वच्छता अभियान’ आयोजित केले गेले. वेगवेगळ्या वयोगटातील व सामाजिक स्तरातील अनेक व्यक्‍तींनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला गणेश मंदीर परिसर स्वच्छ केला, कचऱ्याचे वर्गीकरण करुन विघटनशील कचरा खत निर्मितीसाठी वापरला व अविघटनशील कचरा घंटागाडीला दिला. ह्याच प्रकारचे स्वच्छता अभियान दर शनिवारी किंवा रविवारी वेगवेगळ्या जागी राबविण्यात येते. आता पर्यंत महात्मा नगर पाण्याच्या टाकीचा परिसर (Six Sigma Hospital , पालीका बाजार, विश्‍वनाथ सोसायटी), मार्ग ए (कमिश्नरांच्या घरापासून वावरे बंगला), पंड्या हॉस्पीटल परिसर इ. भागात नागरीकांच्या उत्‌स्फूर्त सहभागातून स्वच्छता केली गेली. त्याचा संदेश सर्व वयोगटात, विषशेतः मुलांमध्ये व तरुणांमध्ये पोहचवला गेला. ह्‍या सर्व कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक श्रीमती. छायाताई ठाकरे व श्री शिवाजीराव गांगुर्डे ह्‍यांचा सक्रीय सहभाग राहीला.

मंचच्या पुढाकाराने पानगळीचा कचरा घंटागाडीत न देता स्थानिक स्तरावर खत करण्याच्या उपक्रमाला हाती घेण्यात आले. ह्‍या करता श्री रंजनभाऊ ठाकरे ह्‍यांच्या सहकार्याने फुलांच्या क्याऱ्या करण्यात आल्या. पानांचा बारिक भुगा करण्याकरीता एक Shredder मशीन सौ. सुप्रिया आगाशे ह्‍यांच्या पुढाकराने विकत घेण्यात आले आहे. ह्‍या सर्वांमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पानाया कचरा न जाळता स्थानिक स्तरावर स्वच्छता करता येईल.

सर्व बाबतीत प्रशासनावर अवलंबून न राहता परंतु प्रशासन तसेच नाशिकमधील अनुभवी जेष्‍ठ व कर्तबगार नागरीकांच्या मदतीने स्वच्छता व हिरवाई वाढविणे व नाशिक शहर कचरा डेपो मुक्‍त करणे हे स्वच्छ्ता या क्षेत्रातील ’सुजाण नागरिक मंच’ चे अंतिम उद्दिष्‍ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक घरातून प्रत्येक इमारत बंगल्यातुन सुरुवात होने आवश्यक आहे. यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याच बरोबर पातळ प्लास्टीकच्या पिशव्या पूर्णपणे वापरातून काढायला पाहिजे. आणि इतर प्लास्टीकचा वापर कमीतकमी करणे गरजेचे आहे.

या उपक्रमाची सुरवात महात्मानगर परिसरापासुन करण्याचे ठरवले आहे. महात्मानगर व परिसराची स्वच्छता प्रशासन व आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरु झाली आहे. येत्या सहा महिन्यात महात्मानगरचा एक ’हरित व सुंदर’ आदर्श परिसर म्हणून इतर परिसरांसमोर आदर्श ठेवण्याचे या मंच्याचे एक उद्दिष्ट आहे.

आपण या उपक्रमाला हातभार लावा आपली इमारत ’हरित व सुंदर’ करा ह्‍या करता काय करावे ते सोबत दिले आहे. शिक्षण क्षेत्रात मंचकडे गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तुंव्दारे मदत करण्याकरता वेळोवेळी शाळांकडुन विनंती करण्यात येते. विल्होळी येथील जिल्हा परिषद शाळामध्ये ४५० स्कुल बॅग देण्यात आल्या, मेहरावनी येथील एका शाळेत संगणक देण्याची व्यवस्था करन्यात आली. दोन होतकरु खेळाडूंना नियमीत आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. त्यातल्या एका मुलीने राज्य स्तरावर सुवर्ण पदक तर दुसरीने रौप्य पदक मिळवून मंचने केलेल्या व्यवस्थेचे चीज केले. मंच अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम निरनिराळ्या मोहल्यांमध्ये नागरिकांनी सुरु करावे म्हणून प्रोस्ताहन देतो व त्यात सहभाग घेतो. सर्व नागरिकांनी स्वच्छता व सुरक्षा याकरीता जागरुक हो‍उन आपले जनप्रतिनिधी आणि महानगरपालीका यांचा समन्वय साधावा व आपले आयुष्‍य निर्मल व आनंदी करावे हाच या सर्व उठाठेवीचा उद्‌देश आहे. सर्वांनी सक्रीय सहभाग घेऊन नाशिकला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनविण्यात हातभार लावावा

सेंद्रिय भाज्या आणि फळे विक्री केंद्र

रसरशीत हिरवीगार दिसणारी भाजी आणि फळांच्या दुकानात मांडुन ठेवलेली ताजी,रसाळ फळे खरेदी करण्याचा मोह झाला नाही अशी व्यक्ती भेटणे दुर्मिळच..!

पण ह्या भाज्यांच्या रसरशीत हिरव्या रंगाचे किंवा फळांच्या तुकतुकीत चमकदार रंगाचे नेमके रहस्य जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? भाज्यांचे गड्डे आकाराने मोठे व्हावे,ते बाजारात खूप दिवस टिकावे किंवा आंबे-केळी यासारखी फळे झटपट पिकावी यासाठी त्यावर किती तरहेतरहेची घातक रसायने मारलेली असतात हे कधी आपल्या कानावर येते का? कॅन्सर,रक्तदाब,सांधेदुखी अशा अनेक शारीरीक व्याधींनोत आमंत्रण देणारी हि रसायणे रोज या भाज्यांच्या आणि फळांच्या निमित्‍ताने आपल्या पोटात जात असतात. मुख्य म्हणजे, भाज्या धुण्याच्या कोणत्याही पध्‍दतीचा परिणाम या घातक रसायनांवर होत नाही.

आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक अशा या घातक उत्पादनांना पर्याय देणारी, शंभर टक्के सेंद्रिय पध्‍दतीने उत्पादित केलेल्या भाज्या आणि फळे उपलब्ध करुन देणारी एक पर्यायी चळवळ नाशिकमध्ये रुजत आहे आणि वाढत आहे.महामार्ग बस स्थानकाजवळ श्री. मोराणकर सर यांच्या घराच्या अंगणात सुरु झालेल्या या प्रयत्नांना आता ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे.सेंद्रिय भाज्या,फळे आणि धान्य खरेदी करण्यासाठी रविवारी सकाळी रांगा लावून ग्राहक उभे असतात असे एक आश्‍वस्त करणारे दृश्य आता तिथे दिसू लागले आहे.

ग्राहकांचा हा प्रतिसाद लक्षात घेऊनच सेंद्रिय भाज्या-फळे आणि धान्य याचे आणखी एक विक्री केंद्र महात्मानगर परिसरात सुरु करीत आहोत.गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या परिसरात दर आठवड्यांला स्वच्छ्ता मोहिम राबवणाऱ्या "सुजाण नागरिक मंच" या नागरिक पुढाकारातर्फे हा उपक्रम हाती घेतला जात आहे.